महायुतीत पुन्हा वाद उफाळला:एकनाथ शिंदेंमुळेच भाजप सत्तेत
महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, भाजप नेत्यांच्या वक्तृत्वावर शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आज राज्यात भाजप जी सत्तेत आहे, ती केवळ तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची कृपा आहे, असे ठणकावून सांगत धंगेकरांनी भाजपला शिवसेनेचे आभार मानण्याचा सल्ला दिला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर भाजपचे विजय चौधरी आणि अमरीश पटेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा धंगेकर यांनी जाहीर निषेध नोंदवला. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अशा वाचाळ नेत्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.